मंचर (प्रतिनिधी) –आंबेगाव तालुक्यातील माळीण, आंमडे गावठाण व वाड्यावस्त्या, तिरपाड गावठाण व वाड्यावस्त्या, फलोदे गावठाण आणि वाड्यावस्त्या तसेच निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील गावांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांत सुरू केला जाणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचेसभापती संजय गवारी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विविध गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. डोंगरदरीतून आदिवासी महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागते. माळीण, आंमडे गावठाण व वाड्यावस्त्या,तिरपाड गावठाण व वाडयावस्त्या,फलोदे गावठाण आणि वाड्यावस्त्या तसेच निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पंचायत समिती आंबेगावकडे केली होती. त्यानुसार तहसील आणि प्रांत अधिकारी मंचर यांच्यामार्फत टॅंकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आले. यासंदर्भात मंत्री वळसेपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करून पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची कार्यवाही करण्यात यावी, असे कळवले होते. मंगळवारी (दि. 21) जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली असल्याचे उपसभापती संतोष भोर यांनी सांगितले. ता संबंधीत गावांना पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांपासून टॅंकरद्वारे सुरू केला जाईल, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.