मुंबई: राज्यातून दोन दिवसांत 25 रेल्वेनी विविध राज्यांमधील कामगार स्वगृही परतले आहेत. यात पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही दोन राज्ये वगळता इतर राज्यांशी पार पडलेल्या चर्चेनुसार त्या राज्यांचे कामगार पाठविण्यास सुरुवात झाली आहे. देशात आतापर्यंत 100 रेल्वे या श्रमिकांची वाहतूक करीत असून महाराष्ट्रातून 20 टक्के श्रमिकांनी लाभ घेतला आहे.
राज्यातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बाहेरील राज्यातून श्रमिकांना घेऊन कालपर्यंत 2 रेल्वे आल्या आहेत. यात युपीएससीच्या दिल्ली येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात रेल्वेशी बोलणी झाली असून लवकरच त्यांना भुसावळ येथे आणले जाणार आहे.
मध्यप्रदेश सरकारने केवळ त्यांच्या राज्यातील श्रमिकांसाठी रेल्वेचे सर्व पैसे भरल्याची माहितीही देण्यात आली. या श्रमिकांना प्रत्येक डब्यात 50 जण असे सुरक्षित अंतर ठेऊन पाठविण्यात आले. त्यांना मास्क, जेवण, पाणी, पुरविण्यात आले.
महाराष्ट्रातून स्वत:च्या वाहनाने इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी आतापर्यंत 2 लाख 48 हजार ई-पासेस देण्यात आले आहेत. एसटी बसेसचे नियोजन ही वाहतुकीच्या दृष्टीने पुढील काळासाठी तयार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी दिली. परराज्यातील लोकांप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या लोकानांही आपापल्या घरी जाण्यासाठी मंत्रीमंडळ सदस्यांनी सूचना केल्या.