विशाखापट्टणम: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी वायूगळतीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रूपयांची भरपाई जाहीर केली. वायूगळतीमुळे श्वसनाचा त्रास झाल्याने अनेकांना उपचारासाठी विविध रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींना प्रकृती चिंताजनक बनल्याने कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. त्या रूग्णांना उपचारासाठी आंध्र सरकारकडून प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे.
त्याशिवाय, इतर रूग्णांना उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रूपयांची मदत दिली जाईल. वायूगळतीमुळे पाच गावांमधील सुमारे 15 हजार ग्रामस्थ प्रभावित झाले आहेत. त्यांनाही प्रत्येकी 10 हजार रूपयांची मदत सरकार उपलब्ध करणार असल्याचे जगन यांनी स्पष्ट केले.