मुंबई : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनी राज्यातील गणितच बदलून टाकले आहे. जिकडे अबकी बार 220 पार म्हणणाऱ्या भाजपला मतदारांनी 105 वरच रोखले तर दुसरीकडे शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. या सर्वांत भाजपला फटका तर विरोधी पक्षाला चांगलाच फायदा झाला असल्याचे दिसत आहे. कारण मागील विधानसभा निवडणुकीत विरोधीपक्षाचा सुपडासाफ झाला होता तेच विरोधी पक्ष यावेळी सत्ता स्थापण करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, यासर्व घडामोडीत राज्याच्या राजकारणात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे यंदाच्या निवडणुकीत एक दोन नव्हे तर तब्बल 24 महिला आमदार निवडूण आल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभेत यावेळी दोन डझन म्हणजेच 24 महिला आमदार विजयी झाल्या आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकी 235 महिलांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात 24 महिला उमेदवारांना आमदारकीचा मान मतदारांनी दिला आहे. तसेच निवडणूकीत सर्वाधिक भाजपच्या 12 महिला नेत्यांनी विजय मिळविला आहे.
पाच कॉंग्रेसचे, तीन राष्ट्रवादीचे आणि दोन शिवसेनेचे आहेत. दोन अपक्ष महिला आमदांचा या नवनिर्वाचित आमदारांच्या यादीत समावेश झाला आहे. दरम्यान या सर्व महिला आमदार आता राज्याच्या विधानसभेत आवाज उठवणार आहेत. या 24 पैकी 12 महिलांनी विक्रम स्थापण करत सलग दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी विजय मिळवला आहे. तर 12 नव्या चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत 20 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या त्यात यंदा आणखी 4 महिला आमदारांनी वाढ झाली आहे.