टाकळी ढोकेश्वर -केंद्र सरकारच्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील 23 विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी आले होते. ते जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या बसने घराकडे रवाना झाले आहेत. तसेच नगर येथील उन्नाव येथील नवोदय विद्यालयात गेलेले 15 विद्यार्थीही परतीच्या प्रवासाला निघाले असून, ते उद्या (दि.4) रात्रीपर्यंत नगरला येतील, अशी माहिती प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी दिली.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता नववीतील 23 विद्यार्थी आदान-प्रदान योजनेंतर्गत सुरू असलेल्या अभ्यासक्रमासाठी आले होते, तर टाकळी येथील नवोदय विद्यालयातील 15 विद्यार्थी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे गेले होते. एप्रिल अखेर अभ्यासक्रम संपवून ते परत येणार होते. मात्र करोनाचा हाहाकार पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू केल्याने हे सर्व विद्यार्थी अडकून पडले होते.
दरम्यान नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबतची माहिती पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना दिली. त्यांनी तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट देवून विद्यालयाचे चेअरमन तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधला. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी उन्नाव येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याची परवानगी मिळविली.
टाकळी ढोकेश्वर येथे आलेल्या उन्नाव येथील 23 विद्यार्थ्यांना आज सकाळी साडेआठ वाजता एसटी महामंडळाच्या बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपल्या घराकडे रवाना करण्यात आले. तसेच उन्नाव येथे गेलेले नगरचे विद्यार्थीही परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
यावेळी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना करोना संदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य एस. पी. बोरसे, कामगार तलाठी स्वप्नील गोरे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी हात वर करून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.