शाळा सुरू करण्यापूर्वी केलेल्या चाचणीचा निष्कर्ष
पुणे – राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी बंधनकारक केली आहे. यात 2 हजार 212 शिक्षक व 682 कर्मचारी करोनाबाधित सापडले आहेत.
करोनामुळे गेले आठ महिने शाळा बंद होत्या. मात्र, अनलॉक प्रक्रियेदरम्यान नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार त्यापूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे बंधन घातले होते.
राज्यात 2 लाख 27 हजार 775 शिक्षक आणि 92 हजार 343 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यातील आतापर्यंत 1 लाख 51 हजार 539 शिक्षकांनी, तर 56 हजार 34 कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी करून घेतली आहे. अद्यापही काहींची करोना चाचणी झालेली नाही. चाचणी केलेल्या काही शिक्षक व कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली होती. त्यांना उपचार घेऊन अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत शाळेत जाता येणार नाही. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 265 शिक्षक व 115 कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत.
यात शिक्षकांच्या तुलनेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. पुण्यात 20, गडचिरोली 46, सातारा 34, यवतमाळ 57, औरंगाबाद 37, भंडारा 36, रायगड 43, अहमदनगर 33, वर्धा 37 कर्मचारी करोनाबाधित आढळले, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून देण्यात आली.
जिल्हानिहाय करोनाबाधित शिक्षक
अमरावती – 47, गडचिरोली-80, उस्मानाबाद-69, सातारा-80, सोलापूर-247, अकोला-40, यवतमाळ-120, लातूर-87, जालना-69, औरंगाबाद-92, नंदूरबार-26, बुलढाणा-119, गोंदिया-180, चंद्रपूर-265, भंडारा-97, रत्नागिरी-9, सांगली-20, रायगड-83, सिंधुदुर्ग-21, वाशिम-49, बीड-58,कोल्हापूर-38, अहमदनगर-40, पुणे-92, वर्धा-30, धुळे-15, जळगाव-31, नांदेड-86, नाशिक-35, परभणी-21, पालघर-27, मुंबई-21, हिंगोली-65.