नवी दिल्ली : केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
देशातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतोय. पण फक्त एकमात्र पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकरी या योजनेचा लाभ मिळत नाही. कारण बंगालमधील सरकार राजकीय कारणामुळे त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू देत नाहीय. यात राज्याला एक पैसा भरायचा नाही. पश्चिम बंगालमध्ये तीस वर्ष एका पक्षाचे सरकार होते. त्याच पक्षाचे लोक आता पंजाबमध्ये येऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत. तुमच्या मनात शेतकऱ्यांबद्दल इतके प्रेम आहे मग, पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पैसे मिळावे म्हणून का आंदोलन केले नाही ? असा सवाल मोदींनी केला.
I urge you to tell farmers about the Kisan Credit Card and its various benefits which include the availability of loans at low-interest rates: PM Modi to a farmer from Odisha https://t.co/NtFIVw70OK
— ANI (@ANI) December 25, 2020
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. शेतकऱ्याच्या जीवनातील आनंद हा सर्वांचा आनंद आहे. आधी पीक वाया जायचे आता विकले जाते. शेतकऱ्यांच्या जमिनीवरुन भ्रम निर्माण केला जात आहे. आज रुपया चुकीच्या माणसाच्या हातात जातात नाही. आज दिल्लीवरुन रुपया निघतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो. संगणकाच्या एका क्लिकवरुन नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले. यात कुठला कट नाही, हेराफिरी नाही. हेच सुशासन आहे. शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नसल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.
तसेच सरकारने ज्या योजना सुरु केल्या. त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? यासारख्या अनेक प्रश्नांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी घेतली. ओदिशामधील एका शेतकऱ्याशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, किसान क्रेडिट कार्डचे खूप फायदे आहेत. खूप कमी दरात व्याज मिळते. तुम्ही इतर शेतकऱ्यांना याची माहिती द्या असे देखील यावेळी पंतप्रधानांनी म्हटले.