पुणे – एरवी आक्रमक भाषा बोलणारे आणि आक्रमक कृती करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेबाबत बोलताना आपल्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाची महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळानंतर कॉंग्रेस पक्षाचे मुंबईतील नेते स्वबळावर निवडणुका लढवूया, अशी घोषणा करीत आहेत. मुंबई विभागीय कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मुंबईत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर महापालिका निवडणूक लढवेल, असे जाहीरही करून टाकले.
अन्य नेते आघाडी एकत्रपणे मुंबई महापालिका लढवेल असे सांगत असताना भाई जगतापांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा कॉंग्रेसचा आवाज उमटवीत असतात. कॉंग्रेस नेते वेगवेगळ्या प्रकारे पक्षाचे अस्तित्व दाखवून देत असतात. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेनेशी जमवून घ्या, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना देत आहेत.
सध्या राज्यात 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. प्रचार तापू लागला आहे. काही महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका लगेचच होणार आहेत. अशा राजकीय रणधुमाळीत खडाखडी होत असतेच. खुद्द अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमनेसामने उभे ठाकले आहेत.
शिवसेनेचे संपर्कमंत्री अनिल परब यांचा सत्कार आणि शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा नुकताच झाला. त्यात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारच शिवसेनेची अडवणूक करतात, जिल्हा परिषदेच्या निधीचा विनियोग राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षपातीपणे करतात अशा स्वरूपाच्या तक्रारी परब यांच्यासमोर करण्यात आल्या. आघाडीतील बिघाडी पुणे जिल्ह्यातच दिसू लागली. अन्यत्रही थोड्याफार फरकाने असेच राजकीय वातावरण असेल. त्याची दखल घेऊन अजित पवार यांनी “सबुरीने रहा’ असे सांगितले असावे.