नगर –सामाजिक कार्यकर्ते व सीताराम सारडा शाळेचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला हा सुपारी घेऊन करण्यात आल्याचे तपासात समोर आले असून त्यासाठी 15 हजार रुपये ठरले होते. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी बुधवारी सकाळी सनी ज्ञानेश्वर जगधने (वय 24 रा. रंगभुवन सर्जेपुरा) व अक्षय कैलास माळी (वय 20 रा. घासगल्ली) या फरार झालेल्या दोघांना अटक केली. हल्ल्याचा माझ्यावर काहीच फरक पडला नाही, जखमा भरून येत असल्याने उद्या (गुरुवारी) शाळेत जाणार असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी आज स्पष्ट केले.
या कटातील अक्षय विष्णू सब्बन, चैतन्य सुनील सुडके यासह एक अल्पवयीन अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय माळी व सनी जगधने हे दोघे फरार आहेत. यातील चैतन्य सुडके याच्यावर यापूर्वीही तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सब्बन याची सीताराम सारडा शाळेजवळ पानटपरी होती. या टपरीला मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी हरकत घेतली. त्यांच्या तक्रारीवरून महापालिकेने टपरी हटविली होती. त्यामुळे पोलिसांचा सब्बन याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, तो माहिती देत नव्हता. सीसीटीव्हीत हल्लेखोरांचे दुचाकीवर फोटो मिळाले होते. या फुटेजमधील एका आरोपीसारखा दिसणारा मुलगा कोंड्यामामा चौकात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उर्वरित आरोपी अटक केली. त्यात अक्षय माळी व सनी जगधने हे दोघे फरार झाले होते. त्यांची माहिती मिळताच त्यांनी आज सकाळी अटक करण्यात आली.
माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. जखमा भरून येत आहेत. उद्यापासून (गुरूवार) मी पुन्हा शाळेत कामावर जाणार आहे. माझे काम सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार हेरंब कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.