वाढीव कोटा निश्चित करण्यास शासनाची चालढकल
पुणे – ऑक्टोबर संपत आला, तरी पाऊस सुरूच असल्याने खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के जादा पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी राज्य शासनाने अजूनही महापालिकेसाठी पाण्याचा वाढीव कोट निश्चित केलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षी धरणांमध्ये पुरेसे पाणी असले, तरी जुन्याच कराराने पाणी मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, मागील वर्षी दिवाळीतच एकवेळ पाणीकपात करण्यात आली होती.
मागील वर्षी परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे सप्टेंबर 2019अखेर 85 टक्के पाणीसाठा होता. कालवा समिती बैठकीवेळी धरणात कमी पाणी होते. तसेच उपलब्ध पाणी शहर आणि ग्रामीण भागासह वर्षभर पुरवणे आवश्यक असल्याने महापालिकेस एकवेळ पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्याचे पडसादही उमटले होते. मात्र, त्यानंतर कडक उन्हाळा आणि जून संपला, तरी लांबलेला पावसामुळे यंदा तरी पुन्हा धरणे भरतील का नाही, याबाबत शंका होती. मात्र, आता ऑक्टोबर 2019 संपत आला तरी पाऊस सुरूच असल्याने या वर्षी धरणांत तब्बल 98 टक्के पाणीसाठा पाणीसाठा आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 13 टक्के जादा पाणीसाठा धरणात आहे.
करारावर ठरणार कपातीचा निर्णय
महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा पाणीकरार ऑगस्ट 2019 मध्येच संपला आहे. त्यातच, महापालिकेने शासनाकडे शहरासाठी 17 टीएमसी पाण्याची मागणी केली असली, तरी शासनाने अद्याप त्याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने प्रतीवर्ष 11.50 टीएमसी पाणी करार करण्याचा प्रस्ताव महापालिकेस दिला होता. पालिकेच्या स्थायी समितीनेही त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे वाढीव कोटा मंजूर होईपर्यंत पुणेकरांना कपातीचा सामना करावाच लागणार आहे.