कोल्हापूर (प्रतिनिधी) – ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व महापुराच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या कोल्हापुरातील 1247 वीज कर्मचाऱ्यांचा महावितरणने गौरव केला असून, यातील 592 कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
महापुराच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद करणे अथवा पूर ओसरल्यानंतर तो सुरु करणे असो, ही दोन्ही कामे आव्हानात्मक होती. या सर्व कठीण व प्रतिकूल परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांनी पूर बाधित भाग वगळता उर्वरित भागांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत मेहनत केली.
पूर ओसरताच टप्प्या-टप्प्याने वीजपुरवठा सुरळीत केला. समाजातील विविध घटकांनी त्याची दखल घेतली. या सर्व कर्मचाऱ्यांना गौरविण्यासाठी महावितरण सांघिक कार्यालयाने रोख बक्षीसापोटी पाच लाख रुपये दिले.
त्याचे वितरण मंगळवारी (दि.19) कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता अंकूर कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी महापूर काळात कर्तव्य बजावताना शॉक लागून मृत्यमुखी पडलेले कर्मचारी संजय जाखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.