शैलेश धारकर
गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंडपासून ते दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. या पुराने राज्य हतबल झाली आहेत. निसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे. समुद्रात उंचच उंच लाटा येत आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणे भरून वाहत असून भूस्खलनाचे प्रकारही घडत आहेत. आसाम राज्यातील एकतृतीयांश लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथके पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करत आहेत. आंध्र प्रदेशातील एका पूरग्रस्त भागात बचाव अभियानावर देखरेख करणारे आयएएस अधिकारी भास्कर यांनी सुमारे 225 गर्भवतींना सुरक्षित ठिकाणी नेले.
या राज्यांत 95 गावातील एकूण 20,900 जणांना फटका बसला. असे चित्र अनेक राज्यांत दिसत आहे. दक्षिणेतील गोदावरी नदी 32 वर्षांनंतर 71 फुटांपेक्षा अधिक उंचीवरून वाहत असून ही आतापर्यंतची दुसरी सर्वाधिक उंचीची पातळी मानली जात आहे. तेलंगणातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्राचलन शहरासह नऊ मंडळात पुरामुळे बिकट स्थिती झाली आहे.
जगभरात पुरामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी एकपंचमांश मृत्यू भारतात होत आहेत.
भारतातील चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यूस पूरस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. गंगा नदीच्या खोऱ्यात आणि परिसरात मुसळधार पाऊस होतो. त्याचवेळी भूकंप आणि वाळू उत्खननामुळे नदीची खोली सारखी बदलत राहते. त्यामुळे पुराचा धोका वाढतो. सतत पावसाचा सामना करणाऱ्या ब्रह्मपुत्र नदीचा भूस्खलन, भूकंपामुळे बदलणारा प्रवाह परिणामी या कारणामुळे मोठा पूर येतो.
पंजाबात सिंचन क्षेत्रात साचलेले पुराचे पाणी योग्यरित्या बाहेर काढले जात नाही. त्याचवेळी हिमालय आणि काश्मीरमध्ये
ढगफुटी होणे, हिमनदीचे सरोवर फुटणे यासारख्या गोष्टी घडत असतात.