मुंबई : जागा वाटपातील आवश्यक निर्णय चार तारखेपर्यंत घेऊ. त्यानंतर या बाबतच्या सर्व गोष्टींवर ८ तारखेला दसरा मेळाव्यात मी बोलेन, असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. नंदुरबारचे काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरें पत्रकारांशी बोलत होते.
आपली स्वप्नं साकारण्यासाठी युवकांनीच आता पुढे येऊन राजकारण आणि सरकार हातात घेऊन काम केलं पाहिजे. युवकांनीच आता देश आणि महाराष्ट्र घडवला पाहिजे. राजकारणात आजवर युवकांना केवळ स्वप्ने दाखवली गेली ती स्वप्ने घेऊन ते आजही जगत आहेत. हवं संदेश आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीने द्यायचा होता. असे ते म्हणाले.
आदित्यला जनतेने स्वीकारले आहे. तो माझ्यापेक्षा जास्त काम करतोय. त्यामुळेच तो निवडणुकीला समोरा जातोय. तू माझा मुलगा आहेस म्हणून शिवसेनेवर कधीही लादणार नाही आणि तुला जनतेने स्विकारले तरच तू यशस्वी होशील, असे शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले होते.
ठाकरे घराण्याची सेवेची परंपरा आहे ही परंपरा आता आदित्य पुढे नेत असल्याने आनंद आहे. यासाठी सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या विकासाठी आणि युवकांच्या स्वप्नांसाठी तो लढतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले.