मुंबई: युतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला ६ जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत ३ दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचा घटक म्हणून रिपाइंला ६ जागा अधिकृतरित्या सोडण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा आणि मराठवाड्यात नायगाव, पाथरी तसेच मुंबईत मानखुर्द शिवाजीनगर अश्या सहा जागा रिपाइंसाठी सोडण्यात आल्या आहेत.
सहा जागांपैकी चार जागांवर आठवलेंनी उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये मानखुर्द शिवाजीनगर मधून गौतम सोनावणे, फलटणमधून दीपक निकाळजे, पाथरीमधून मोहन फड आणि नायगाव मधून राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, माळशिरसची जागा रिपाइंला आल्याने या जागेवर विजयसिंह मोहिते-पाटील उमेदवार निश्चित करतील. मात्र माळशिरसमध्ये जर रिपाइंचा कार्यकर्ता उमेदवार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोमेंट जागा द्यावी, अशी मागणी आठवलेंनी केली आहे. या मतदार संघात भाजपने यापूर्वी उमेदवार जाहीर केला आहे.