कॉंग्रेस, जेएमएम प्रणित महाआघाडीला स्पष्ट बहुमत
81 पैकी 48 जागांवर मिळवला विजय
भाजपला 24 जागांवरच रोखले
रांची : झारखंड विधानभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चारी मुंड्या चीत करीत कॉंग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चा प्रणित महाआघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. येथील 81 जागांपैकी महाआघाडीला 48 जागा मिळाल्या असून भाजपला केवळ 24 जागाच मिळू शकल्या आहेत. महाआघाडीला मिळालेले हे निर्णायक बहुमत आहे. झारखंड विकास मोर्चाला तीन, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला तीन आणि अन्य पक्ष व अपक्षांना चार जागा मिळाल्या आहेत.
सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात 37 जागा मिळवल्या होत्या व अन्य पक्षांच्या मदतीने त्यांनी येथे सरकार स्थापन केले होते. जेमतेम सहा महिन्यांपुर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात एक हाती यश मिळवले होते पण आज विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना निर्णायक पराभवाचा सामना करावा लागला. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच महाआघाडी भाजपच्या पुढे होती. पण तरीही आम्हीच सरकार स्थापन करू असा दावा मुख्यमंत्री रघुबरदास यांनी व्यक्त केला होता. पण सगळे निकाल स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी लगेच पराभव मान्य केला. या पराभवाची कारणमिमांसा लवकरच केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख व राज्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेते हेमंत सोरेन हेच या राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे जवळपास निश्चीत मानले जात आहे. 44 वर्षीय हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे संस्थापक शिबु सोरेन यांचे चिरंजीव आहेत. या आधीहीं हेंमत सोरेन यांनी अल्पकाळासाठी राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवले होते. 2009 ते 2013 या काळात ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. जुलै 2013 मध्ये सुमारे वर्षभराच्या काळासाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी केवळ वयाच्या 39 व्या वर्षी त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती.