- वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय
चऱ्होली – परिसरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी चऱ्होलीवासीयांनी एकत्र येत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्याला सर्व ग्रामस्थ, व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यामुळे परिसरातील सर्व रस्ते, चौक तसेच भाजीमंडईचा परिसर निर्मनुष्य दिसून आला.
करोना रुग्णांचा वढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी गुरुवार (दि.24) ते शनिवार (दि.26) पर्यंत सलग तीन दिवस शंभर टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये फक्त दवाखाने, औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. इतर भाजी व किराणामालासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. चऱ्होली ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी ध्वनिक्षेपकाद्वारे संदेशही देण्यात येत आहे.
दिघीतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1100 आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस या संख्येमध्ये भरच पडत आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा वाढता उद्रेक थांबविण्यासाठी चऱ्होली ग्रामस्थांच्या वतीने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये ग्रामस्थांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीने तीन दिवस शंभर टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदमधून फक्त औषधांची दुकाने वगळण्यात आल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली. सकाळी भरणारी भाजीमंडई, किराणा दुकाने व इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पहिल्याच दिवशी बंद यशस्वी केला आहे. रोज करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे या संकटाने घाबरून न जाता योग्य खबरदारी घेऊन व संपर्काची साखळी तोडणे हा एकमेव उपाय करून तीन दिवस चऱ्होली परिसर बंद ठेवण्यात आला आहे.
गजबजलेल्या चौकांत शुकशुकाट
चऱ्होली येथील मुख्य वेताळ बुवा चौक, भाजी मंडई परिसर असलेला श्रीमंत दाभाडे सरकार चौकात शुकशुकाट होता. नागरिकांनी शंभर टक्के जनता कर्फ्यू पळत घराबाहेर पडणे टाळले आहे. आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली फाटा, साई मंदिर कोतवालवाडी चौकसुद्धा मोकळे पडले होते. तुरळक वाहने दिसली तरी अत्यावश्यक काम असल्यामुळे ती बाहेर पडली असल्याचे सांगितले.