बेल्हे (पुणे) – यंदा झेंडूचा हंगाम बहारात आला आहे. मात्र, भाव गडगडले आहेत. बाजार किलोमागे केवळ 10 रुपये मिळत असल्याने फूल उत्पादक हवालदिल झाला आहे. फुलांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी फुलांना बाजार दाखवण्यापेक्षा नैराश्यापोटी फुले बांधावरच फेकून दिली आहेत. यामुळे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
ज्या फुलांना गणपती उत्सवात 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे बाजारभाव होता, त्या फुलांना आता बाजारात कवडिमोल किंमत मिलत आहे. जुन्नरच्या पूर्व भागातील राजुरी, उंचखडक, साळवाडी, जाधववाडी, शिरोली सुलतानपूर, भोरवाडी, वडगाव कांदळी या गावांमध्ये झेंडू,ऍष्टर, मोगरा, गुलाब या जातीच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहेत.
मध्यतंरी गणपती उत्सवात या फुलांना चांगला बाजारभाव देखील मिळाला होता; परंतु गणपती उत्सव संपल्यावर या फुलांचा बाजारभाव अतिशय गडगडला आहे. त्यातच करोनामुळे मंदिरे बंद असल्याने फुलांना मागणीच नसल्याने शेतकऱ्यांची फुले शेतातच पडून आहेत. सध्या झेंडुला किलोमागे 10 ते 15 रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फुलांची तोडणीच बंद केलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी फुले तोडूनन फेकून दिली आहेत. काही शेतकऱ्यांनी फुलांच्या बागा उपटून काढल्या आहेत.
- हमीभाव देण्याची मागणी
फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. हजारो रुपये खर्च करून जर फुलांना बाजारभावच मिळत नसेल तर हा झालेला खर्च फेडायचा कसा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने फुलांना हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
- मी दीड एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली होती. सध्या फुलांना बाजारभाव नाही. त्यात सततच्या पावसाने फुलांना काळसरपणा आला आहे. बाग उपटायला सुरुवात केली आहे. दीड एकरला 50 हजार रुपये भांडवल खर्च झाले होते. 2 ते 3 लाख रुपये उत्पादन अपेक्षित होते; परंतु बाजरभाव पडल्याने उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही.
– स्वप्नील भंडारी, फूल उत्पादक शेतकरी, बेल्हे