नवी दिल्ली : करोना विषाणूमुळे निर्माण परिस्थितीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय मंत्रालये आणि राज्यांनी विविध सक्रिय पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी आज ट्विटरवरुन सांगितले.
घाबरुन न जाण्याचे आणि अनावश्यक प्रवास तसेच मोठ्या प्रमाणावरील सामूहिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे. केंद्र सरकारमधील कोणीही मंत्री सध्या परदेश प्रवास करणार नसल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
करोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उद्यापासून पुढील सूचनेपर्यंत राष्ट्रपती भवनातील सफर बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुल आणि चेंज ऑफ गार्ड समारंभही नागरिकांसाठी पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.