नवी दिल्ली : भारतातील बहुतांश बॅंकांची भांडवली परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे शंका घेण्याची कसलीही गरज नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाचे सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
येस बॅंकेचे संदर्भात निर्माण झालेली परिस्थिती केवळ त्या बॅंकेपुरती मर्यादीत आहे. संपूर्ण बॅंकींग विश्वाचा त्याच्याशी काही संबंध नाही असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, बॅंकाच्या भांडवली परिस्थिती संदर्भात सीआरएआर ( कॅपिटल टु रिस्क ऍसेटस् रेशो) ) हे प्रमाण वापरले जाते. जागतिक पातळीवर हे प्रमाण 8 टक्के असताना भारतीय बॅंकांचे हे प्रमाण मात्र सर्वसाधारणपणे 14.3 टक्के आहे. यावरुन भारतातील बॅंकांच्या भांडवली परिस्थितीचा अंदाज येतो असे ते म्हणाले.
या अगोदर बॅंकांमध्ये ठेवलेल्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा उतरविला जात होता. मात्र आता सरकारने 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे यातील बहुतांश ग्राहकांना चिंता करण्याचे कसलेही कारण नाही असे ते म्हणाले.
येस बॅंकेमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नामुळे रिझर्व बॅंकेने या बॅंकेच्या कामकाजावर एक महिन्यासाठी निर्बंध आणले आहेत. मात्र येस बॅंकेची परिस्थिती चांगली असल्यामुळे हे निर्बंध लवकरच उठविले जातील असे संकेत त्यांनी दिले. येस बॅंकेचा प्रश्न अतिशय कार्यक्षम पद्धतीने हाताळला गेला आहे. आता येस बॅंकेचे 50 टक्के भाग भांडवल भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेकडून घेतले जाणार असल्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांना चिंता करण्याची कसलीही गरज नाही असे त्यांनी सांगितले.