नगर – करोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र बंद असल्याने शासनाने मंदिर बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरेही बंद आहेत. आजचा अवघ्या महाराष्ट्राचा असलेला आषाढी एकादशीचा उत्सव, दिंडी सोहळेही रद्द केल्याने भाविकांची मोठी निराशा झाली आहे.
नेप्ती येथील नर्मदेश्वर मंदिराच्यावतीनेही आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज आषाढी एकादशीनिमित्त सकाळी अभिषेक करुन, पादुकांचे पुजन करुन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली व लवकरात लवकर या करोनातून मुक्ती मिळवून पुन्हा आषाढी दिंडी व सोहळ्यांचे आयोजन करण्याचे साकडे विठ्ठल-रुख्मिणीला घालण्यात आले.
याप्रसंगी वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, संजय महाराज महापुरे, झुंबर महाराज आव्हाड, रामदास महाराज शेटे, बाबासाहेब गोलांडे, नगरसेविका सुवर्णा जाधव, दत्ता जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महिलांनी डोक्यावर कलश, तुळस, टाळ-मृदूंगाच्या विठ्ठल नामाचा गजरात ही मंदिर प्रदशिक्षणा घालण्यात आली. यावेळी मंगल जाधव, मिनाताई सत्रे, कडूस नाना, मृदूंगाचार्य अंकुश महाराज, डोंगरे महाराज, भोसले महाराज, कुलट महाराज आदी उपस्थित होते.