मुंबई : मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.