मुंबई : राज्यात आत्तापर्यंत आणखी ८२ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ८२ पैकी ५९ रुग्ण मुंबईतले आहेत.
महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.
महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ही प्रमुख शहरं रेड झोनमध्ये गेली आहेत. घराबाहेर पडू नका, अगदीच आवश्यकता असेल तर मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, भाजीपाला, किराणा घेण्यासाठी गर्दी करु नका या प्रकारचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
तसंच तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. ही संख्या शून्यावर आणण्यासाठी सगळे उपाय योजतो आहोत ही लढाई आपण जिंकणारच असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.