अलंकापुरीतील शिवस्वराज्य प्रतिष्ठानचा इशारा : दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
आळंदी – आळंदी नगरपरिषदेच्या व्यापारी संकुल क्रमांक 2 येथे उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहामुळे दुर्गंधीचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. तरी हे स्वच्छतागृह बंद करावे अथवा ते इतरत्र हलविण्यात यावे, अशी लेखी मागणी शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी करण्यात आली.
मात्र, नगरपरिषदेच्या वतीने त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शिवस्वराज्यचे कार्यकर्ते संतप्त झाले असून या स्वच्छतागृहाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आळंदी व्यापारी संकुल क्रमांक दोनमध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पुतळ्याच्या प्रथम दर्शनी भाग स्वच्छ, सुंदर, आकर्षक असा आहे. मात्र, पुतळ्याच्या मागेच स्वच्छतागृह असल्याने सहन न होणारी दुर्गंधीचा असते. याबाबत शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीन दि. 17 ऑक्टोबर 2018, दि. 10 जानेवारी 2019 रोजी लेखी स्वरूपात विनंती अर्ज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्याकडे लेखी स्वरूपात देऊन येथील स्वच्छतागृह इतरत्र हलवावी किंवा त्या ठिकाणी कंपाउंड करून व पुतळा सुरक्षेसाठी स्मारकाला स्टील कंपाऊंड करून गेट बसून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व पुतळ्याच्या सुरक्षिततेसह तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पालिकेने घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.
मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी परिस्थिती “जैसे थे’ असल्याने पालिकेने शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे दोन्ही लेखी अर्ज कचऱ्याच्या डब्यात टाकले असावेत, असा आरोप प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत काकडे यांनी केला आहे. येत्या सात दिवसांत स्वच्छतागृह इतरत्र न हलविल्यास ती प्रतिष्ठानच्या वतीने बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.