वडिवळे रस्त्यावरील पूल धोकादायक
अरुंद आणि धोकादायक पूूूल
सध्या स्थितीला हा पूल खूपच अरुंद आहे. एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. पुलावरून दररोजची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या तुलनेने पूल मजबूत स्थितीत नाही. पहिल्याच पावसात पुलाच्या कठड्यापर्यंत नदीच्या प्रवाहाचे पाणी आले. हवामान खात्याचा अंदाज पाहता या पावसाळ्यात हा पूल अधिक दिवस पाण्याखाली राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन पूल करतावेळी उंच व रुंद पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
नाणे मावळ – नाणे मावळातील दुर्गम भागात समावेश असणाऱ्या वडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, खांडशी, नेसावे, वेल्हवळी, मुंढावरे व उंबरवाडी या गावांना कामशेत शहराला जोडणारा पूल धोकादायक स्थितीत आहे. छोटा आणि अरुंद पूल हा दुर्गम भागाकडे जाणारा एकमेव मार्ग आहे. मावळातील हा भाग पश्चिम भागात असल्याने या भागात अधिक प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असतो.
याशिवाय लोणावळा भागातील पावसाचे पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रातून या भागातच येत असते. परिणामी वडिवळे गावातील हा पूल दरवर्षी दहा-बारा दिवस पाण्याखालीच असतो. अतिवृष्टीच्या काळात नऊ गावातील नागरिकांची गैरसोय होत असते. शाळकरी मुले, कामगार, दूध व्यावसायिक यांना आपल्या कामावर पाणी सोडावे लागते.