आळंदी – येथे गेली पाच-सहा दिवसांपासून वरुणराजा सतत बरसत आहे, त्याचबरोबर मावळात तो धो-धो बरसत आहे. त्यामुळे तेथील नदी, नाले, ओढे, तळी विहिरी “ओव्हरफ्लो’ झाल्याने इंद्रायणीच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे, त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हजारो टन जमा झालेली जलपर्णी ही येथील वरच्या व खालच्या दोन्ही बंधाऱ्यात प्रचंड प्रमाणात वाहत आली असून त्यामुळे बंधाऱ्यास धोका पोहोचू शकतो, असे नागरिकांचे मत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दीतून ढकलून देण्यात येत असलेली लाखो टन जलपर्णी आळंदी येथील नव्या पुला नजीकच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला अडकली असून या जलपर्णीमुळे बंधाऱ्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून इंद्रायणी नदीला पूर आल्याचे चित्र आहे. या पुरात पिंपरी-चिंचवड भागातील चिखली, मोशी, डूडुळगाव आदी भागातून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आहे, त्याबरोबरच आळंदीच्या जुना पुला जवळच्या बंधाऱ्यात वर्षभर अडकलेली जलपर्णी देखील फुगूनवर आली आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा ढीग बंधाऱ्याच्या भिंतीला अडकला आहे. पाणी जोरात वाहत असताना जलपर्णी अडकल्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामावर ताण येऊ शकतो कदाचित बंधारा फुटूही शकतो यामुळे जलपर्णी काढून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.