पुन्हा कॉंग्रेसच्या इच्छेकडे केला अंगुलिनिर्देश
रायबरेली – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. लढायचे की नाही, याविषयी प्रियंका यांनी पुन्हा पक्षाच्या इच्छेकडे अंगुलिनिर्देश केला आहे.
प्रियंका त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्याऐवजी उत्तरप्रदेशच्या रायबरेलीतून लढतील, अशी शक्यता मागील महिन्यात पुढे आली. त्यावेळी त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर प्रियंका यांनी वाराणसीतून काही नाही, असा उलट सवाल करत चर्चांना तोंड फोडले. त्यानंतर वाराणसी आणि प्रियंका ही चर्चा जोरात आहे. मंगळवारी येथे पत्रकारांनी त्यांना वाराणसीतून लढण्याबाबत विचारल्यावर त्यांनी पक्ष सांगेल ते मी करेन, या भूमिकेचा पुनरूच्चार करत सस्पेन्स कायम ठेवला. जनतेला बदल हवा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. प्रियंका यांना वाराणसीमधून उमेदवारी देण्याविषयी त्यांचे बंधू आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याआधीच चेंडू टोलवत सस्पेन्स टिकवण्याचीच खेळी केली आहे. वाराणसीच्या मुद्द्यावर प्रियंकाच निर्णय घेतील, असे राहुल यांनी म्हटले होते.