शरद पवार यांनी दिले संकेत ः काम करणाऱ्यांना मते मिळतात
“त्यांच्यापासून’ मलाही प्रेरणा
माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या भाषणात विजयी होणाऱ्या उमेदवाराला संधी द्यावी, असे आवाहन करतानाच “मी’ नाही असे सांगितले होते. तोच धागा पकडत पवारांनी लांडे यांची फिरकी घेतली. ते म्हणाले, आताच लांडे यांनी मी नाही म्हणत इतरांना संधी देण्याबाबत सुतोवाच केले. त्यामुळे मी देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेत “मी देखील नाही’ असे पवार म्हणाले. पवारांच्या मिश्किल टिप्पणीमुळे सभागृहात एकच हशा निर्माण झाला. हाच धागा पकडत पवार यांनी नवीन उमेदवारांना संधी देण्याबाबतचे सूचक वक्तव्य केले.
पिंपरी – लोकसभेप्रमाणे विधानसभेत एखाद्या चेहऱ्याला पाहून मतदान होत नाही. स्थानिक प्रश्न, काम करणारा नेता यांच्याकडे पाहून मते मिळतात. लोकांना बदल हवा असतो त्यामुळे विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले.
भोसरी येथे गुरुवार (दि.6) आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, अण्णासाहेब बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर मयूर कलाटे, संजय वाबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा होता. मात्र विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे भाजपला जनतेने पुन्हा संधी दिली. मात्र विधानसभेसाठी लोकसभेप्रमाणे मतदान होत नाही.
स्थानिक पातळीवरील प्रश्न, उमेदवार, काम करण्याची पद्धत, जनतेमध्ये असलेला विश्वास या बाबींवर मतदान होते. कोणाचे काम चांगले यावर जनता विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी देत असते. विधानसभा अडीच महिन्यांवर आलेली असल्याने आता कोणतेच काम हातात न घेता आजपासून कामाला लागा. विधानसभेसाठी सर्वांनी एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघातून एकच नाव सुचवा, असेही पवार म्हणाले. सर्वांना विश्वासात घेताना नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करा. नागरिकांना बदल हवा असतो. तोच तो चेहराही मतदार नको असतो.
जनतेला बदल हवा असल्याने नवा चेहरा दिला तर लोक मते देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेला नक्कीच निकाल वेगळा लागेल असा विश्वास व्यक्त करून पवार म्हणाले, सर्वांना सोबत घेवून जाणारी आपली विचारसरणी आहे. जनतेसोबतचा संवाद वाढविताना घरोघरी जावून संपर्क करा, त्यांच्या अडचणी समजून त्यावर उपाय काढतानाच वैयक्तिक अडचणी देखील सोडविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तिन्ही जागांवर विजय मिळवायचाच!
पिंपरी-चिंचवड शहर हा आपल्या विचारसरणीचा बालेकिल्ला आहे. जेव्हा राजीव गांधी यांनी देशात 400 खासदार निवडून आणले, त्यावेळी देखील या शहराने मला साथ देत विजयी केले होते. आपल्या काही चुकांमुळे सध्या विरोधी विचारांच्या हातात शहराची सूत्रे गेली आहेत. शहरातील तिनही विधानसभेच्या जागांवर यावेळी आपणाला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. आपल्या हातात पुढील अडीच महिने आहेत. गतवेळी झालेल्या चुकांचा अभ्यास करून त्या दुरुस्त केल्यास नक्कीच जनता साथ देईल, असेही पवार म्हणाले.