नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असतानाच देशात बेरोजगारीच्या दराने गेल्या अडीच वर्षातील उच्चांक गाठला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८. १ टक्के इतका झाला आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) या संस्थेने बेरोजगारीची ही आकडेवारी दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, नरेंद्र मोदी सरकारने रोजगाराच्या संदर्भातील आकडेवारी कायम दडवली आहे. मात्र कोंबडं झाकलं म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही. विविध जागतिक पातळ्यांवरील संस्था भारतातील रोजगाराचे भीषण वास्तव सांगतच आहेत. मोदी सरकारने आर्थिक पाहणी अहवाल तर सादर केला नाहीच, पण एनसीआरबीचा वार्षिक गुन्हे अहवालही प्रसिद्ध केलेला नाही. सत्य परिस्थिती लपवून नरेंद्र मोदी सरकार या देशातील जनतेला धोका देत आहे, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.