पुणे – हिंजवडी आणि आयटीपार्क परिसरातील गावांमध्ये कचऱ्यांची समस्या दिवसेंन दिवस वाढत आहे. रहिवाशांची वाढती संख्या, आयटी कंपन्यांमुळे वाढलेले हॉटेल व्यवसाय यामुळे घनकचऱ्याची समस्या अधिक जाणवत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून काही महिन्यांपूर्वी या गावांची बैठक घेऊन त्याबाबत त्यांना सूचना केल्या होत्या. त्यावेळी रहिवाशांनी देखील ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय वाढले आहेत. या हॉटेलमधील ओला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने परिसरात दुुर्गंधी पसरत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याकडे गांभीर्याने पाहून जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामपंचायतींना हा प्रश्न सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ बैठका घेऊन कामे मार्गी लागणार नाहीत तर त्यावर अमंलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्रकल्प राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. तसेच काही उपाययोजना देखील सूचवण्यात आल्या होत्या. स्थानिक स्तरावर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण व त्याच ठिकाणी प्रक्रिया करणे तसेच कमीत कमी सार्वजनिक कचरा निर्माण होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.