पिंपरी – गावात संघटन असेल तर गावाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. एकीचे बळ फार मोठे असून सगळ्याच गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी ठरवले आणि कामाला सुरवात केली तर निश्चित गावच्या अडीअडचणी दूर होतात. एकच ध्यास गावचा विकास याप्रमाणे विकास होतो, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महिमानगड येथे “सत्यमेव जयते वॉटर कप’ योजने अंतर्गत श्रमदान प्रसंगी सातारा मित्र मंडळ सांगवी पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले.
गेली अनेक वर्ष या भागात पाऊस पडत नाही .पाण्याचा मोठा प्रश्न असल्याने शेती करता येत नाही. अनेक वर्ष शेती पडीकच, गावातील अनेक लोकांनी पाण्यासाठी स्थलांतर केले. पण गावात एकी नसल्यामुळे या प्रश्नाकडे कोणी गांभिर्याने पाहिले नाही. पण आज या गावाने “सत्यमेव जयते वॉटर कप’ योजनेत भाग घेऊन जोमाने कामाला सुरवात केली. यासाठी गावातील तरुण प्रदीप सावळकर, गणपत जाधव, निसार मुलानी, गौरव मदने, अखिल भारतीय धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कूचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला एक करून श्रमदानाला सुरवात केली आणि बघता-बघता श्रमदानाचे काम सुरू झाले.
रोज दोनशे ते अडीचशे गावकरी श्रमदान करतात. यामध्ये फक्ततरुण व प्रौढ व्यक्तीच नाही तर अनेक महिला व विद्यार्थी मुलांनी सुद्धा या श्रमदानात भाग घेऊन काम करत आहेत. यावेळी टाटा मोटर्स चे कामगार समाजभूषण रवींद्र कोकाटे यांनी यासाठी पाणी फाउंडेशन कमिटीला 11 हजार रुपयाची मदत केली. यावेळी टाटा मोटर्स पिंपरीचे क्वालिटी ग्रुपचे डी.जी.एम आशिष कदम, सतीश शिरोडे, शंतनू शेवाळकर, रमेश पाटील, सातारा मित्र मंडळ सांगवी पुणेचे खजिनदार सोमनाथ कोरे, उपाध्यक्ष संजय चव्हाण, केतन काटकर यांनी सर्व गावकऱ्यांबरोबर सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत श्रमदान केले.