अहमदनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांचे भाषण केवळ काल्पनिक घटनांवर असून, त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगून केवळ करमणूक म्हणून असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कर्जत येथील सभेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर बोलत, राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणेज कोंबड्या विकण्याचा धंदा असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानविरोधात कारवाई नव्हे तर चर्चा करू, असे आश्वासन त्यात देण्यात आले आहे. शिवाय काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या शरद पवारांना कोणी तरी सांगायला हवे की, आपला देश आता चर्चा करणारा नाही, तर घुसून मारणारा आहे. त्यामुळे मतदारांनी अशा माणसांच्या हाती देशाची सूत्रे देऊ नयेत, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता, टीव्ही वर ज्याप्रमाणे मालिका सुरु होण्यापूर्वी दाखवण्यात येते, की यातील घटना या काल्पनिक असून याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. त्याप्रमाणेच काही लोकांची भाषणे सुरु होण्यापूर्वी अशा सूचना द्याव्या लागणार असल्याचे ते म्हणाले.