दोन बाधित आढळल्याने भीती कायम; अर्थ विभाग बंदच राहण्याचे संकेत
सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि अर्थ विभागातील एक लिपिक करोनाबाधित आढळल्यानंतर गुरुवारपासून जिल्हा परिषद लॉकडाऊन करण्यात आली होती. सोमवारी जिल्हा परिषदेचे दरवाजे उघडणार असले तरी अर्थ विभाग बंदच राहणार असल्याचे संकेत आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये करोनाने शिरकाव करु नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली. मात्र दोघेजण बाधित आढळल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी हादरले. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांनी तातडीने पावले उचलत जिल्हा परिषद गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस बंद ठेवण्याचे जाहीर केले. या कालावधीत जिल्हा परिषदेचा परिसर, कार्यालय येथे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने सलग चार दिवस जिल्हा परिषदेची इमारत बंद राहिली. सोमवारी ही इमारत पुन्हा खुली होणार आहे.
सोमवारपासून जिल्हा परिषद सुरु होणार असली तरी अर्थ विभाग बंदच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवस कार्यालयात औषध फवारणी केली असली तरी दोन्ही इमारतीत गांभीर्य ओळखून औषध फवारणी करण्याची गरज आहे. अधिकारी, कर्मचारी भीतीखाली न राहता काम करतील, असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी लागू केलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. खासगी वाहनांना प्रवेश न देण्याचा चांगला निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याचप्रमाणे महत्वाच्या कामाशिवाय कोणासही प्रवेश दिला नाही तर गर्दी नियंत्रणात आणण्यात यश येणार आहे.
मास्क न वापरणाऱ्यांना आवरा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंडाची तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी मास्क, आयकार्ड वापरतात. मात्र अनेक कर्मचारी चेहऱ्यावर मास्क लावत नाहीत, गळ्यात आयडेंटी कार्ड लावत नाहीत. शासकीय कर्मचारीच असे वर्तन करणार असतील तर त्यातून चुकीचा संदेश समाजात जात आहे. या पार्श्वभूमीवर शिस्तप्रिय असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत निश्चितच कठोर पावले उचलतील यात शंका नाही.