जयेश राणे
व्यसनांच्या विळख्यात आजची तरुण पिढी आकंठ बुडालेली दिसते. आजचे तरुण उद्याचे भविष्य, मात्र वर्तमानच अंधारात असल्याने भविष्याचे चित्र आताच धूसर झाले आहे. या तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून अलगत बाहेर काढावे लागेल, ही काळाची गरज आहे.
नोकरी-व्यवसाय करताना, शिक्षण घेताना तसेच बालपणापासूनही अनेकजण आपल्या संपर्कात येत असतात. समविचारी लोकांसह पटकन विचार जुळतात. त्यामुळे समविचार कोणते आहेत हेही पाहावे लागेल. चांगले सोबती अभावानेच भेटतात. याउलट असलेल्यांची कमतरता नाहीच. काही लोक असे म्हणतात की, ज्यांना व्यसन नसते ते लोक कायम हातचे राखूनच वागत असतात. ते कधीच मोकळेपणाने बोलत नाहीत. खरंतर त्यांचे हे वाक्य अत्यंत फसवे आहे. मुळात यात काहीच तत्त्वज्ञान नाही. एखादा व्यसनी माणूस स्वतःच्या दारू, सिगारेट अशा दोन्ही किंवा दोघांपैकी एक असणाऱ्या किंवा याहीपेक्षा पुढच्या टप्प्याचे व्यसन असल्यास कशाप्रकारे चुकीचे समर्थन करतात, हे आपल्या लक्षात येते. अशा व्यसनी लोकांना सुशिक्षित म्हणावे का?
प्राचीन मंदिरे पाहिल्यावर आठवण येते ती तत्कालीन स्थापत्यशास्त्र आणि हुशार कारागिरांची. कोणतीही अत्याधुनिक साधने उपलब्ध नसताना त्यांनी उभारलेली मंदिरे आजही सर्वांचे लक्ष वेधतात. बुद्धी सात्विक असेल तर आचार-विचारही तसाच असतो आणि त्यातून होणारी निर्मिती ही अद्भुत अशीच असते. यास्तवच प्राचीन मंदिरे, कारागीर, स्थापत्यशास्त्र आजही नीटपणे कळू शकलेले नाही. आता कोणाला वाटेल व्यसनाचा आणि याचा काय संबंध? सध्या करत असलेले काम आणि तत्कालीन कारागिरांनी केलेली निर्मिती लक्षात घेतली तर नक्कीच ते उजवे ठरतात, हे कळते. कारागीर व्यसनी असते तर इतकी सुबक निर्मिती करू शकले असते का? आजचे अनेक तरुण व्यसनी नसते तर नक्कीच शारीरिकदृष्ट्या सक्षम असते, तसेच अनेक अनैतिक गोष्टींनाही वाव मिळाला नसता. इतिहासापासून या तरुणांनी काहीच बोध घेतलेला नाही. इतिहासाला इतिहासात ठेवून दिले आहे आणि इंग्रजांची व्यसने मिरवण्यात धन्यता मानण्यात येत आहे.
इतिहासापासून कायम बोध घेत राहिले असते, तर आजचे भारताचे चित्र आतापेक्षा अधिक चांगले असते. केवळ भौतिक प्रगती, चांगल्या पगाराची नोकरी हेच म्हणजे जीवन नाही.
स्वतःसाठी आणि समाजासाठी किती समर्पितपणे जीवन जगले जाते, हे महत्त्वाचे आहे.
स्त्रियांत धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या बाहेर जी छोटी दुकाने असतात, त्यांतून सिगारेट घ्यायची अथवा ती वैयक्तिकही स्वतःसह ठेवायची आणि धूम्रपान करायचे, असे चित्र पाहायला मिळते. आता येथे सांगा, काय उपयोग आहे, यांच्या शिक्षणाचा. कमाई स्वतःची असली तरी त्याचे होत असलेले जाहीर प्रदर्शन सामाजिक हानी करणारे आहे. अशांना धूम्रपान करताना पाहिल्यावर आश्चर्य व्यक्त करणारे, हे काय चालायचच, असे म्हणणारे यांना कोण काय बोलणार असा विचार करणारेही आहेत. त्यांना थेट जाऊन सांगणे वादाचे ठरू शकते यात दुमत नाही. मात्र, अशा लोकांचे अनुकरण न करण्यासाठी जागृती तर नक्कीच करू शकता. अन्यथा उद्याच्या पिढीतील कोणीतरी उघडपणे, लपून त्यांचेच अनुकरण करत आहे, असे लक्षात येईल. बड्या आस्थापनात चाकरी करताना कामाचा ताण असला तरी कोणत्याही व्यसनाच्या कुबड्यांचा उपयोग न करता कार्यरत राहायचे आहे, हे सुरुवातीपासूनच सांगणे आवश्यक असते.
सुरुवातीला सिगारेटचे व्यसन त्यानंतर पुढे मद्य, अंमलीपदार्थ यांच्या जाळ्यात कधी ओढले जाते, हे लक्षातही येत नाही. एकदा या गोष्टींच्या आहारी गेल्यावर त्यातून बाहेर पडणे अशक्य असते. त्याचा अतिरेक झाल्यावर शरीराचा खुळखुळा होतो. काहीजण असेही म्हणतात की, मी अतिरेक करत नाही. मी एका मर्यादेपर्यंतच स्वतःला काबूत ठेवले आहे. दिवसातून एक-दोन वेळाच व्यसन करतो. मात्र, असे वागून ते स्वतःलाच फसवत आहेत. एखादा अधिक व्यसनी वेगाने आजाराकडे ओढला जाईल, तर कमी व्यसन करणारा थोडासा उशिराने आजाराकडे ओढला जाईल. थोडक्यात, दोघेही एकाच मार्गाने मार्गस्थ होतात. तेही स्वतःच्याच वेदनादायी अंतिम क्षणांकडे!
व्यसन हे कधीही जडू शकते. अल्पवयात अथवा त्यानंतरही व्यसनाच्या जाळ्यात ओढले न जाण्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. स्त्री-पुरुष यांना असलेले व्यसन त्यांच्या अपत्यांवर परिणाम करणारे असते. दोन व्यक्तींना असणारे व्यसन किंवा दोघांपैकी एकाला असणारे व्यसन हे नवजात बालकासाठी त्रासदायक असते, हे सत्य आहे. पण याकडे कोणाचे लक्ष आहे? त्या बालकाला होत असलेला त्रास तो बोलून दाखवू शकत नाही; पण आपल्यामुळे एका लहान जीवाला त्रास होत आहे. याचेही काही सोयरसुतक नसते. व्यसनाचा त्रास तो करणाऱ्याला होईल तेव्हा होईल. मात्र, त्यांच्यामुळे कोणाकोणाला त्रास होऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी-व्यवसाय यासाठी करताना स्वतःच्याच शारीरिक, मानसिक समृद्धीसाठीही झाला पाहिजे.