मुंबई – राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. 105 आमदार निवडून आल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपने त्यांच्यावर अन्याय केल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा, असा टोला चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वैनगंगा-पांगोली सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या भंडाऱ्याच्या साकोली येथे काल उपस्थित राहिल्या होत्य. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “आमची काळजी करू नका, तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा. आमचे देवेंद्रजी आणि त्यांच्या मागे महाराष्ट्राच्या जनतेचा जनाधार आहेत. लोकांनी त्यांना मांनलेअसल्यानेच त्यांना लोकांनी निवडून दिले आहे.
“आजच्या तारखेलासुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार कुणाच्या नेतृत्वात आले, तर ते देवेंद्रजी आणि भाजपच्या नेतृत्वात आले. तुम्ही आपलं बुडतं जहाज बघा, आपलं जे काही उरलय ते सांभाळा, नाहीतर असं होईल आमच्यावर टीका करण्याच्या नादात जे उरलेत ते सुद्धा आमच्याकडे येतील, याची काळजी घ्या,” अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
“मोठ्या ताई गेल्या दोन तीन दिवसांपासून टिवटिव करत आहेत”
पुढे त्या म्हणाल्या की, “मोठ्या ताई गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत टिवटिव करत आहेत. आम्ही ते पाहत आहोत. याच भंडाऱ्यात अग्निकांड झालं होतं. 11 कोवळी मुलं जळून खाक झाली होती. तेव्हा या ताई कुठ होत्या? तुमचं सरकार होतं, त्यावेळी तेव्हा त्या कुठे होत्या? मला त्यांना सांगायचे आहे. मोठ्या ताई तुम्ही आपले दिवस आठवा अडीच वर्षात फक्त सत्ता उपभोगली आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. महिला आणि मुलींच्या रक्षणासाठी असणाऱ्या निर्भया कायद्याला तुम्ही विरोध करता,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर चित्रा वाघ यांनी टीका केली.