-हिमांशू
योगी आदित्यनाथ मुंबईची फिल्म सिटी उत्तर प्रदेशात घेऊन जाणार, या चर्चेमुळे अनेकांना उगीचंच असं वाटू लागलं की, हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलला, त्याप्रमाणं ते बॉलिवूड उचलतील आणि नोएडामध्ये नेऊन ठेवतील.
योगी येण्याच्या आधीपासून सुरू झालेला वाद एकमेकांची संस्कृती काढेपर्यंत जाऊन पोहोचला. मुंबईप्रमाणंच हैदराबाद, चेन्नई या शहरांमध्येही फिल्म सिटी आहेत, मग माहिती घेण्यासाठी योगी तिकडे का गेले नाहीत, हा प्रश्न त्यातल्या त्यात मुद्द्याला धरून वाटला. बाकी आनंदीआनंद! भारतात कुठेही जाऊन पाहणी करण्याचा, अभ्यास करण्याचा योगीजींना हक्क असला, तरी शंभर एकरावर नव्यानं फिल्मसिटी उभारण्याचा विचार डोक्यात घोळत असेल, तर हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीचा अभ्यास अधिक उपयुक्त ठरला असता.
अर्थात हा झाला टेक्निकल मुद्दा. योगीजींचा संबंध नेहमी भावनिक मुद्द्यांशी जोडला जातो. त्या हिशोबाने त्यांनी मुंबईपाठोपाठ नाशिकमध्ये जाऊन दादासाहेब फाळके स्मारकाला भेट दिली असती, तर त्यांना नवी चित्रपटसृष्टी उभारण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाली असती. भारतीय चित्रपट उद्योगाच्या या जनकाचं स्मरण योगीजींनी केलं की नाही, कोण जाणे! केलं असेलच तर त्यांना ध्यास कशाला म्हणतात हे समजलं असतं. हा ध्यास कुणाला हवाय का, हा प्रश्नच आहे; परंतु काही ना काही कारणामुळे बॉलिवूड गाजत राहील, हे मात्र हल्ली आवर्जून पाहिलं जातंय.
योगीजींचं स्वागत करायला साक्षात अक्षयकुमार हजर राहिल्यामुळेही काहींच्या पोटात गोळा आला असण्याची शक्यता आहे. परंतु बॉलिवूडची बदनामी केल्याबद्दल दाखल केलेल्या याचिकेतही तो याचिकाकर्ता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात, योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे महाराष्ट्र सरकारची झोप उडालीय, अशी टिप्पणी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या ए. एन. सिंह यांनी केल्यानंतर मात्र त्यांच्या भेटीमागं “ध्यास’ किती होता यावर लख्ख प्रकाश पडला. “आम्ही तुमचे काही घेऊन जाणार नाही. प्रश्न स्पर्धेचा आहे,’ असं बोलकं ट्विटही सिंह यांनी केलं.
बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडी पाहिल्या असता योगीजींनी निवडलेली वेळसुद्धा वादाला पोषक ठरली आणि मग ठिणगी पडली. उत्तरेकडील अनेक निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. या सगळ्यांना अचानक योगींची चित्रनगरी जवळची वाटू लागेल, अशी भीती काहीजणांना वाटणं स्वाभाविक आहे. हैदराबाद, चेन्नईच्या फिल्मसिटीमध्ये स्थानिक भाषांमधील चित्रपटांची निर्मिती होते तर बॉलिवूडमध्ये हिंदी चित्रपटांची निर्मिती होते, हा महत्त्वाचा फरक दुर्लक्षित करता येणार नाही. परंतु जोपर्यंत दादासाहेब फाळके यांचा ध्यास बॉलिवूडमध्ये शिरोधार्य मानला जातोय, तोपर्यंत “स्पर्धा’ वगैरे होईल; पण “दुसरं बॉलिवूड’ आकाराला येणार नाही.
अक्षयकुमारने मोठ्या टॅबवर योगीजींना कोणतं “प्रेझेंटेशन’ दिलं, याचीही उत्सुकता अनेकांना आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अक्षयकुमारची “आंबे चोखून खाण्याची कला’ पुन्हा
चर्चेत आली. बॉलिवूडला नावं ठेवणारेच अखेर बॉलिवूड पाहायला आले, हा काळानं उगवलेला सूड आहे, असंही बोललं गेलं. परंतु खळबळ उडाली एवढं मात्र खरं. अस्वस्थ झालेल्यांनी तूर्तास बॉलिवूडचे धागे कुठे-कुठे जोडले गेलेत, याचा सूक्ष्म अभ्यास केल्यास सगळी दडपणं गायब होतील… टेन्शन नै लेनेका!