मुंबई – मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये चांगलेच सत्तानाट्य रंगले होते. ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडलेली शिवसेना आणि या मागणीला भाजपने नकार दिल्याने दोन्ही मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. रविवारी अखेर शिवसेना एनडीएतून अधिकृतरीत्या बाहेर पडली. अशातच मुख्यमंत्रीपदाचा वाद लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरु झाल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर भाजप ज्येष्ठ नेत्याने सांगितले कि, लोकसभेच्या युतीवेळी शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. यासंबंधी शिवसेना-भाजपमध्ये चर्चाही झाली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना मध्यरात्री फोन करत युती तुटली तर? असा प्रश्नही विचारला होता. यासंदर्भात अमित शहा आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंद खोलीमध्ये चर्चाही झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. परंतु, अमित शहांसह भाजपमधील काही नेते शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास इच्छूक नव्हते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेसोबत युती तोडायची नव्हती, अशी माहिती भाजप नेत्याने दिली आहे.
दरम्यान, महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत आता वेगाने हालचाली होत असून आजच्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.