नवी दिल्ली – भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यू समई ते 66 वर्षांचे होते. यशपाल शर्मा 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांच्या अचानक जाण्याने क्रिडाविश्वावर शोककळा पसरली आहे.
Yashpal Sharma, a member of the 1983 Cricket World Cup-winning team, died of cardiac arrest this morning. pic.twitter.com/9GaDPMsKyZ
— ANI (@ANI) July 13, 2021
11ऑगस्ट 1954 रोजी लुधियाना येथे जन्मलेल्या क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांनी 1978 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शर्मा यांनी १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यांनी ३७ कसोटींत १६०६ धावा, ४२ वन डेत ८८३ धावा केल्या होत्या.
इंग्लंड मालिकेतील कामगिरीमुळे त्यांना आणखी कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कानपूर कसोटीत त्यांनी शतक झळकावले. १९८०-८१मध्ये व्हिक्टोरीया संघाविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी ४६५ मिनिटांत नाबाद २०१ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती.
१९८१-८२ साली भारतीय संघात पुनरागमन करताना त्यांनी इंग्लंडविरुद्ध मद्रास कसोटीत १४० धावा कुटल्या होत्या. त्यांनी गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासोबत संपूर्ण दुसरा दिवस खेळून काढताना तिसऱ्या विकेटसाठी ३१६ धावांची भागीदारी केली होती. पुढील वर्षी पोर्ट ऑफ स्पेन येथील कसोटीत मॅलकोल्म मार्शल यांच्या चेंडूवर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली अन् त्यांना सामन्यातून रिटायर व्हावे लागले.
१९८३च्या वर्ल्ड कपसाठी त्यांची निवड झाली आणि पहिल्याच सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कपमधील तो पहिलाच पराभव होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली होती.