हिंगोली – हिंगोली तालुक्यातील राजूरा शिवारात गारपीटीमध्ये गारांचा तडाखा बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता. 9 रात्री घडली आहे. देवराव रुद्राजी बाभळे (65) असे मयत शेतकऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथील शेतकरी देवराव बाभळे यांचे राजूरा (ता.हिंगोली) शिवारात शेत आहे.
या ठिकाणी असलेल्या चार एकर शेतामधील उत्पन्नावर त्यांच्या कुटूुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतात पिक नसले तरी देवराव हे शेतातील आखाड्यावरच राहतात. नेहमी प्रमाणे ते मंगळवारी ता. 9 रात्री शेतातील आखाड्यामध्ये झोपले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपटीमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पाने गळून पडली तर शेतातील आखाड्यावरील पत्रे उडून गेली.
शेतातीत आखाड्यावर थांबलेले देवराव हे गारपीटीच्या तडाख्यामध्ये सापडले होते. गारांचा तुफान मारा यामुळे त्यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. काही वेळानंतर गारपीट व पाऊस थांबल्यानंतर त्यांच्या मुलांनी शेतात जाऊन पाहिले असता देवराव हे गंभीर जखमी अवस्थेत शेतात पडलेले आढळून आले.
त्यांनी तातडीने देवराव यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. मयत देवराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.