अलिकडे एक मतप्रवाह चांगलाच रूढ होतोय की, सोशल मिडियामुळे आपले वैवाहिक सहजीवन उध्वस्त होतंय किंवा सोशल मिडियात लोकांचा वावर वाढल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलंय. मला मात्र अजिबात असं वाटत नाही. कारण याची आणखी एक बाजूही विचारात घ्यावी लागेल. कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये असणारे सहजीवन हे फक्त त्यांच्यामधील परस्पर संबंधावर, विश्वासावर, व्यक्ती म्हणून असणाऱ्या वैयक्तिक प्रवृत्तीवर, आजूबाजूच्या परिस्थितीतून, इतर नात्यांतून निर्माण होणारे प्रसंग ते दोघे कसे समजून घेऊन, डील करतात यावर अवलंबून असतात. यातून जो काही परिणाम होतो तो फक्त त्या दोघांच्या वर्तनातून, आकलनातून तयार होत असतो. यासाठी सोशल मिडिया कसा जबाबदार असावा?
ज्या सहजीवनात मतभेद असतात, नाते मनाविरुद्ध घडलेले असते, विश्वासाचा, प्रेमाचा अभाव असतो, परस्परांशी आदरभाव नसतो तेच दोघे किंवा त्यापैकी एखादी व्यक्ती हे सर्व भाव इतरत्र शोधत राहते. जिथे शोध संपतो तिथेच ती व्यक्ती स्थिरावते. आपलं मन मोकळं करते. प्रसंगी भावनेच्या भरात वाहवतही जाते. कधी कधी अती हव्यासापोटी स्वतःचे सांसारिक सहजीवन (जे कधीच सोबत नसते) किंवा आयुष्यही संपवते. परंतु, यासाठी सर्वस्वी त्या सहजीवनातील दोन्ही किंवा एखादी व्यक्तीच कारणीभूत असते.पूर्वी सोशल मिडिया नव्हता तरीही हे घडतच होतं. तेव्हाही आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये अशा जागा शोधल्या जायच्या. अगदी नात्याची लाज वगैरे वाटावी अशा ठिकाणीही हे नव्या नात्याचे बंध तयार होत असतं. यामध्ये अनेकदा समाजात पावित्र्य राखल्या जाणाऱ्या नात्यांचा नव्या पण समाजाच्या दृष्टीने अनैतिक वाटेल अशा नात्यात प्रवेश होत असे. अशी नाती गुपचूप जपली जात असत. हे कधी बाहेर पडलंच तर नात्याचा, त्या व्यक्तीचा कडेलोट ठरलेला असे. सगळा गुपचूप मामला! मग यालाच स्वार्थ अशी समाजमान्यता मिळते.
अशा प्रकारे नव्याने तयार होणाऱ्या नात्यात लैंगिक भावनांची पूर्तता किंवा हव्यास, जबरदस्ती तसेच पैसा, पद, संपत्तीची हाव, कौटुंबिक किंवा व्यक्तीपरत्वे अंतर्गत असावे अशा पद्धतीचे अनेक कंगोरे येऊ शकतात. जे पूर्वापार चालत आलेले आहेत आणि आजही कधी कधी लपूनछपून तर कधी उघडउघड सांभाळले जातात. वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही कारणाने असे बंध जपले जातात.
आपल्या “मनातलं’ जाणून घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करणे म्हणजे स्वार्थ कसा असेल? पण आपल्या समाजात जो इतरांसाठी जगतो तो महान आणि जो इतरांची पर्वा न करता स्वतःसाठी जगतो तो वाईट, कॅरॅक्टरलेस ठरवला जातो. जर मानवी आयुष्यच भावभावनांवर आधारित असेल तर याच गोष्टींचा विचार आधी होणार हे ओघाने आलेच.मात्र, आपल्याकडे इतरांच्या भावना समजून घेणारे कमी व स्वतःची मते, विचार इतरांवर लादणारेच जास्त. त्यात भरीस भर आपल्या रितीरिवाज, परंपरा, जात-पात-धर्म आणि नीती-मूल्यांचे ढोल वाजतातच. त्यामुळेच खरं तर मानवी मनाची घुसमट वाढत असते.
दोष मात्र सोशल मिडियासारख्या इतर गोष्टींवर टाकला जातो. सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांना मन मोकळं करण्याची जागा मिळाली हे खरं असलं तरी उठसुठ कुणाजवळही माणूस मन मोकळं करत फिरत नाही. जेव्हा सुरक्षित, विश्वास वाटतो तेव्हाच माणूस आपल्या मनातलं बोलतो. आता याचा विपर्यास करून गॉसिपिंग करणारेही असतातच म्हणा, पण आत्ता ते इथं महत्त्वाचे नाही. कुठल्याही नात्यात परस्परसंबंध फार महत्त्वाचे असतात. तसेच ते दोन्हीकडून जपले तरच त्यास अर्थ असतो. नाही तर एकाच्या हितासाठी दुसऱ्याकडून होणारी फक्त तडजोड होऊन जाते.
त्यामुळे “कसाही जग पण संसार मोडू नको” ही आपल्या समाजाची सहजीवनाची संकल्पना झालेली दिसते. सुंदर सहजीवनासाठी प्रत्येकाने स्वतःच्या व आपल्या जोडीदाराच्या वर्तनाचा, मतांचा विचार आणि आदर करायला हवा. सोशल मिडियावर दोष लावण्यापेक्षा “आपलं काय चुकतंय?” हे पाहायला हवं. “थोड्याशा स्वार्थासाठी आपण आणखी मौल्यवान काही गमावतोय का?’ हे पाहायला हवं. शेवटी प्रत्येक मानवी मन हे विचारांचा अथांग सागर! काय घ्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न उरतो.
====================