खडकवासला धरणसाखळीवर पाऊस प्रसन्न
पुणे – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला असून पाणीपातळीत वाढ होत आहे. खडकवासला धरण 94 टक्के भरले आहे. तर वरसगाव धरणातून 450 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे.
सध्यस्थितीत प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 97 टक्के म्हणजे 28.23 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान खडकवासला धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. विसर्ग केल्यामुळे नदीकाठावरील गावांना शेतीसाठी पाणी मिळेल.
तसेच उजनी धरणात सुद्धा पाणी पोहोचेल. मात्र, यंदा पावसाने दीड महिन्यांपासून विश्रांती घेतली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा स्थिर होता. मागील दोन दिवसांपासून चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत.
मागील 24 तासांत खडकवासला 55 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पानशेत-46, वरसगाव-45 आणि टेमघर धरणात 65 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार 30 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरणातून पॉवरहाऊसद्वारे 600 क्युसेक तर वरसगाव धरणातून 1 हजार 50 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले.