सिडनी – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखण्यासाठी किंवा स्थान उंचावण्यासाठी भारतीय संघाला तिसरा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. तसेच केवळ हाच सामना नव्हे तर चौथा सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. या गुणतालिकेत स्थान उंचावण्यासाठी 150 गुणांची कमाई करावी लागणार आहे.
या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या, भारतीय दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेची अंतिम लढत यंदाच्या वर्षी जूनमध्ये इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून अंतिम फेरीच्या शर्यतीत आपलेही स्थान निर्माण केले आहे. सध्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 असा विजय मिळवला तर त्यांचे पहिले स्थान कायम राहील.
भारताचे सरासरी गुण 75 तर न्यूझीलंडचे 62.50 गुण आहेत. जर, न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध मालिका 2-0 ने जिंकली, तर त्यांची सरासरी 70 टक्के होईल. भारतीय संघाला 70 पेक्षा अधिक सरासरीसाठी 150 गुणांची आवश्यकता आहे. म्हणजे पाच सामने जिंकावे लागतील. भारताने 4 विजय आणि 3 कसोटी बरोबरीत राखल्या तरी 150 गुण मिळवू शकतो.