जीनिव्हा – करोना विषाणूच्या फैलावाला आणि पर्यायाने हजारो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल चीनविरोधात कारवाई करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेकडे केली आहे. या प्रकरणी संयुक्त राष्ट्राने तातडीने हस्तक्षेप करावा आणि चीनला जबरी नुकसानभरपाई देण्यास भाग पाडावे, अशी मागणी लंडनमधील “इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’चे अध्यक्ष आणि “ऑल इंडिया बार असोसिएशन’चे अध्यक्ष आदिश सी. अग्रवाल यांनी केली आहे.
करोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी चीनकडून कोणतीही उपाय योजना केली गेलेली नाही. त्यामुळे जगभरात, विशेषतः भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि त्याचा मोठा आर्थिक तोटाही झाला आहे. आर्थिक मंदी आली. लक्षावधी लोकांचा रोजगार बुडाला. अब्जावधी डॉलरचा चुराडा झाला आणि हे नुकसान चीनमुळेच झाले आहे, असे अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
चीन जागतिक सत्ता व्हावा आणि जैविक युद्धतंत्राच्या आधारे अन्य देशांचे नुकसान व्हावे याचे कारस्थानच चीनने केले आहे. या विषाणूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि उर्वरित जगाला कोणताही इशारा न देण्यामागे चीनचा हाच उद्देश होता. संयुक्त राष्ट्राच्या विविध मार्गदर्शक सूचना आणि ठरावांचे उल्लंघन करणारेच वर्तन चीनने केले आहे, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
चीनच्या अन्य प्रांतांमध्ये करोना विषाणूचा फैलाव झाला नाही. मात्र त्याच वेळी जगभरात मात्र सर्वत्र या विषसाणूचा फैलाव कसा झाला हे मात्र अद्याप रहस्यच आहे. हा घातक विषाणू कसा उत्पन्न झाला, हे देखील अद्याप समजलेले नाही, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.