पिंपळे निलख – पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश करागीर पोटाची खळगी आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तटपुंज्या पगारावर जीव धोक्यात घालून काम करताना दिसून येत आहेत. यांच्या सुरक्षेची काळजी कंपनी अथवा ठेकेदाराकडून घेतली जात नाही. असे काम करताना एखादा अपघात घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कामगार कायद्याचे काटेकोरपणे अमलबजावणी होणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड शहरात व आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मॉल, थेटर, व्यावसायिक ऑफिस गगनाला भिडणाऱ्या इमारतींमध्ये सुरू आहेत. ग्राहकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी या इमारतीच्या समोरील बाजूस जाहिरात फलक, बोर्ड आदी बसविण्यासाठी बहुतांश कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. याकडे कामगार कल्याण मंडळ लक्ष देत नसल्याने ठेकेदारांनी व संबंधित कंपन्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
शहरातील उचभ्रू वस्ती व परिसर असणाऱ्या भागात उंच इमारती व व्यावसायिक कंपनी, तसेच मॉल असलेल्या ठिकाणी या इमारतींची देखरेख ठेवण्यासाठी व स्वच्छता ठेवण्यासाठी तटपुंज्या पगारावर असणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे दिसून येत आहे.
पाच मजली ते आठ मजली व त्या पेक्षाही जास्त उंचीच्या इमारती शहरात आहेत. त्या इमारतींना बाहेरून काळ्या रंगाचे काच बसविण्यात आल्याचे दिसते. परंतु बाहेरील बाजूस असणाऱ्या काचांवर धूळ व इतर घाण जमा झाल्यास ते काच स्वच्छ करण्यासाठी व इमारतीमधील व्यावसायिकांच्या दुकानांची व शोरूमची नावे टाकण्यासाठी काही पैशांसाठी कामगार कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न वापरता जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे दिसून येत आहे.
कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
पिंपळे सौदागर, वाकड, कस्पटेवस्ती तसेच शहरातील इतर भागांत हिंजवडी व इतर आयटी कंपन्या असणाऱ्या परिसरात कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवली जात नसून यात गरीब व मोलमजुरी करणाऱ्या गरीब माणसाचा जीव धोक्यात जात आहे. उंच ठिकाणी काही बांबू व दोराच्या साहाय्याने हे कर्मचारी काच सफाई व इतर कामे करत असल्याचे दिसून येते. तर काही व्यावसायिक सुरक्षा साधनांचा खर्च वाचावा यासाठी विनाकारण व जाणूनबुजून कामगारांना धोका निर्माण करत आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने व कामगार कल्याण मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने काम करणाऱ्या व ते करवून घेणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.