वाठार स्टेशन – ऑगस्ट 2020 मध्ये वाठार स्टेशन येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या फिल्टर प्लांटचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा संबंधित अधिकाऱ्याकडून आढावा घेत लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवरच या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच वाठारस्टेशन येथील नागरिकांच्या घराघरात या योजनेचे पाणी पोहोचणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे युवा नेते नागेशशेठ जाधव यांनी दिली.
नागेशशेठ जाधव म्हणाले, नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी लागणारे पाईप्स व इतर सामग्री जागोजागी येऊन पडल्या आहेत. सालपे घाटातून मुख्य लाईनची कामे पूर्णत्वाकडे चालली असून मुख्य लाईन वाठार स्टेशनच्या फिल्टर प्लांटपर्यंत पोचली आहे.
काही दिवसातच प्रत्येक वॉर्डात, गल्लीबोळातून, वाड्या-वस्त्यामधून तसेच लोकांच्या घराघरापर्यंत पाइपलाइनची अंतर्गत वितरण व्यवस्थेची कामे केली जातील. विशेष म्हणजे या योजनेमुळे जेवढे पाणी वापरले जाणार आहे, त्यानुसारच पाणीपट्टी येणार आहे. त्यामुळे नागरिकांचाही फायदा होणार आहे.
या कामाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण राष्ट्रवादीची टीम, जि. प. सदस्य डॉ. अभय तावरे, पं. स. सदस्य मंगलाताई गंगावणे, माजी पं. स. सदस्य अंकुश जाधव, माजी सरपंच महेश नाना लोंढे, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, माजी सरपंच ऋषिसेन जाधव, उपसरपंच शाहिद मुलाणी, संजय भोईटे, बळीराम काळोखे, दादा घोंगडे, निवृत्ती करे, नामदेव जाधव, या सर्वांचे राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.