संतोष पवार
सातारा –जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने करोनाच्या संकटात कमी मनुष्यबळाच्या जोरावर राज्यात आदर्शवत काम केले. या कामाची सरकारने दखल घेतली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याचीही घोषणा यावेळी झाली. मात्र, सध्या तरी ही घोषणा हवेतच विरल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत आरोग्य विभागातील विविध संवर्गातील 839 पदे रिक्त असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. भरतीबाबत सरकारची सध्या तरी उदासीनता दिसत असून भरतीला मुहूर्त कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेल्या काही वर्षांपासून अनेक पदे रिक्त आहेत. अशीच परिस्थितीत सर्व जिल्ह्यात आहे. करोनाच्या संकटात पदे रिक्त असल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. खासगी सेवा देणारी हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आली होती. याशिवाय अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षे संकटाच्या काळात शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करुन जिल्हावासियांना आरोग्य सेवा पुरवली. ही सेवा बजावताना कित्येक महिने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतली नाही. अनेक कर्मचाऱ्यांचा करोनाच्या संकटात बळी गेला. मात्र, तरीही आरोग्य विभागाने आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडले. या संकटानंतर सरकारने रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यातील राजकीय सत्तानाट्यात ही घोषणा हवेतच विरली असल्याचे दिसत आहे.
सातारा जिल्हा परिषदेत औषध निर्माण अधिकारी 32, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 5, आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी) 3, आरोग्य पर्यवेक्षक (महिला) 3, आरोग्य सहाय्यक (पुरुष) 30, आरोग्य सेवक (पुरुष 10 टक्के) 51, आरोग्य सेवक (पुरुष 40 टक्के) 78, आरोग्य सेवक (पुरुष 50 टक्के) 185, आरोग्य सेविका 408, आरोग्य सहाय्यिका 42, छायाचित्रकार 1, सिनेयंत्रचालक 1 अशी 839 पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, मृत कर्मचारी यांच्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करुन सरकारने विविध पदांची तात्काळ भरती करण्याची गरज आहे. जिल्हावासियांना आरोग्याच्या सुविधा गतीने देण्यासाठी आवश्यकतेनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज असून याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. रिक्त पदे जास्त प्रमाणात असल्याने काही प्रमाणात सेवा पुरवताना अडचणी येत असल्याने आवश्यक पदांची भरती होणे गरजेचे आहे.
डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी