पुणे, दि. 12 (जिल्हा प्रतिनिधी) -खेड तालुक्यातील कनेरसरचे सुपुत्र न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांना भारताचे सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार असल्याने खेड तालुक्याच्या अन् पुणे ज्लिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश उदय लळित हे दि. 8 जानेवारी 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार डॉ. धनंजय चंद्रचूड यांनाच संधी मिळणे अपेक्षित होते. त्यांचा दोन वर्षाचा कालावधी (दि. 10/11/2024)असणार आहे.
न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे वडील स्व. यशवंतराव चंद्रचूड हे 1978 ते1985 या कालावधीत भारताचे सरन्यायाधीश होते. सर्वात मोठा सात वर्षाचा कालावधी त्यांना लाभला होता. पिता-पुत्र सरन्यायाधीश होण्याचा दुर्मिळ योग येणार आहे; परंतु यापूर्वीही न्या. भगवती पिता-पुत्रांनी सरन्यायाधीशपद भूषविले आहे. न्या. चंद्रचूड पिता-पुत्र ही दुसरी जोडी ठरणार आहे. खेड तालुक्यातील कनेरसर येथील मूळचे रहिवासी असलेले चंद्रचूड पिता-पुत्रांनी न्यायदानात अतुलनीय कार्य केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून मोलाची भूमिका बजावल्यानंतर न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड हे 2012 ते 2016 अशी चार वर्षे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. गेली सहा वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
कनेरसर गाव तसेच खेड तालुका व पुणे जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब असल्याचे कनेरसर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, सरपंच सुनीता केदारी, कनेरसर सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र दौंडकर, माजा ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव माशेरे, बापु दौंडकर, जयप्रकाश दौंडकर, ऍड. सुहास दौंडकर
यांनी सांगितले.
चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी हॅटट्रिक
न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. तर वडील स्व. न्या. यशवंतराव चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ भारताचे सरन्यायाधीशपद भूषविले आहे. त्यांचे वडील (न्या. धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा) स्व. विष्णू चंद्रचूड हे 1912 साली एलएलबी परीक्षेत राज्यात प्रथम आले होते. यशवंतराव चंद्रचूड हे 1942 साली व त्यांची मुलगी 1971 साली एलएलबी परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी हॅटट्रिक म्हणून या घटनेस ओळखले जाते.
महत्त्वाच्या न्याय – निवाड्यामध्ये मोलाची भूमिका
देशातील अनेक महत्वाच्या न्याय -निवाड्यामध्ये गेली अनेक वर्षे मोलाची भूमिका न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी निभावली आहे. 2012पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना इयत्ता चौथीची बोर्ड परीक्षा घेण्याचा 2002मध्ये शासनाने निर्णय घेतला होता. न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी तातडीने तो रद्द केला. राम जन्मभूमी खटल्यातील पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठामध्येही त्यांचा समावेश होता, त्याबाबतचा ऐतिहासिक निकाल खंडपीठाने दिला. सध्याच्या महाराष्ट्र शासनासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात असून त्या घटनापीठाचेही डॉ. धनंजय चंद्रचूड हे अध्यक्ष आहेत.