नागपूर – पीएचडीबाबत माझ्या तोंडातून शब्द गेला की ‘काय दिवा लावला जाणार’. त्याचा गाजावाजा करण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मी दिलगिरी व्यक्त केली आहे, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
अधिवेशन सुरु होण्याआधी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी अजित पवार पुढे म्हणाले की, अनेकांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्यावर दुमत नाही. पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी.अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची १५ डिसेंबरला भेट घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
त्यांनी अभ्यास करून बोलत जावे
पीएचडी कुठल्याही विषयावर करता येत नाही. त्यासाठी प्रथम त्या विषयात पदवी मग नंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. पुढे नेट-सेट-पेट सारख्या परिक्षा दिल्यानंतर पुन्हा मुलाखत देऊन कुठे पीएचडीसाठी प्रवेश मिळतो.
एवढेच नाही तर प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांने सादर केलेल्या संशोधन आराखड्यातील विषयावर विद्यापीठाची समिती स्थापन केली जाते व ती समितीच पुढे सर्व गोष्टींची पूर्तता करून त्या संशोधन विषयाला मान्यता देते. त्यामुळे अजित पवारांनी कृपया अभ्यास करून बोलत जावे, असे मत संशोधन करणाऱ्या पीएचडी विद्यार्थ्यांनी मांडले आहे.