रत्नागिरी – कमी आकड्यातला चमत्कार कधी उलटा होईल हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही, अशा शेलक्या शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागणार आहेत, अशा कानपिचक्याही त्यांनी लगावल्या.
“कमी आमदार, तरी चमत्कार’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला होता. यानंतर आज भाजपकडूनही त्याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. कमी आकड्यातला चमत्कार कधी उलटा होईल, कदाचित पूर्ण सरकार बनणार नाही आणि घरी बसायची वेळ येईल, असे प्रसाद लाड म्हणाले. कमी आकड्यात सरकार बनवण्यात किती त्रास होतो, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लवकर कळेल, असा टोला देखील त्यांनी लगाविला.
लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागणार आहेत. हे सरकार लोकांच्या विकासाच्या आड येणारे असल्याची टीकाही त्यांनी केली.तसेच 30 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला तर जनतेने धन्यता मानावी, असे लाड म्हणाले.