अरुण गोखले
माणसाला नेहमीच चार चौघांबरोबर राहायला आवडते. त्याच्या या आवडीमधून स्वत:च कुटुंब, शेजारी-पाजारी, नगरवासी, गावकरी, देशवासी आणि शेवटी अवघा विश्वव्यापी मानव समाज एवढी माणसाच्या आपलेपणाची व्याप्ती ही विस्तारत जाते किंवा ती तशी विस्तारीत जायला हवी.
माणसाच्या मनात स्वत:बरोबरच इतरांचेही भले व्हावे, त्यांचेही कल्याण व्हावे ही शुभकामना असते. ह्याच उदात्त भावनेतून व्यक्ती, समाज हा एकमेकांचे प्रासंगिक शुभचिंतन करीत असतो. मग या शुभचिंतनाचे कारण नव वर्षाचा/नव संवत्सराचा प्रारंभ दिन असेल, जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस असेल नाहीतर एखादा सार्वजनिक सण, उत्सव हे असू शकते.
नववर्षाच्या प्रारंभी/ वाढदिवसाच्या/ वर्धापनाच्या, सण उत्सवाच्या दिवशी आपण एकमेकांचे शुभचिंतन करतो. “हे नवे वर्ष आपणास आनंदाचे, सुख समृद्धीचे, भरभराटीचे जावो’ अशी मनोकामना व्यक्त करतो. या शुभचिंतनाची भाषा, शब्द हे जरी वेगवेगळे असले तरी त्या पाठीमागची सर्वांचे कल्याण व्हावे ही सद्भावना, हेतू, इच्छा मात्र एकच असते.
“सर्वे भवतु सुखिन:’ हे ईश्वराकडे जे माणसाचे मागणे असते किंवा असायला हवे ते विश्वबंधुत्वाचे परस्परांतील नाते जपण्यासाठी आणि टिकविण्यासाठी.
“हे ईश्वरा! सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचे कल्याण कर’ ही जी मागणी असते तीसुद्धा याच उदात्त हेतूने असते की माणसाने केवळ स्वत:पुरता स्वार्थी विचार न करता त्याने स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करावा. त्याचा मी हा मी आम्ही… तू तुम्ही… आणि आपण सारे… इतका व्यापक व्हावा. बरं हे असं सर्वांच्या शुभ कल्याणाची इच्छा, मागणी तरी का करायची तर स्वत:च्या आनंदाबरोबरच आपल्याला इतरांचीही आठवण राहावी. कारण केवळ मी किंवा माझं कुटुंब हेच सुखी नको तर सर्वजणच सुखी असावेत, तरच त्या आनंदाला खरा अर्थ आहे. आनंद आणि सुख हे वाटल्याने घटत नाही तर उलट वाढतच जाते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे जेव्हा आपण सर्वांच्याच शुभचिंतनाची कल्पना मनात बाळगतो. तेव्हा त्या सर्वांच्यात “मी’ हा आलाच हे लक्षात ठेवायला हवं. आपण असे परस्परांचे शुभचिंतन करीत असतानाच त्या शुभेच्छेला जर सक्रिय प्रयत्नांची जोड देऊ शकलो तर ते नक्कीच अधिक संयुक्तिक ठरेल याबद्दल शंका नाही.