अखेरची तुकडी येत्या शुक्रवारी सेवेतून बाद होणार
जोधपूर – कारगील युद्धात अचूक मारा करणाऱ्या आणि “बहादुर’ म्हणून ओळखली जाणारे रशियन बनावटीच्या “मिग-27′ विमाने आता इतिहासजमा होणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातून “मिग-27′ विमानांची अखेरची तुकडी दक्षिण पश्चिम हवाई विभागातून उद्या (शुक्रवारी) सेवेतून बाद करण्यात येणार आहे. जोधपूर येथील हवाई तळावरील विशेष समारंभात “मिग-27’च्या अखेरच्या 7 विमानांना निरोप दिला जाणार आहे. यानंतर देशभरात कोठेही “मिग-27′ विमान उडवले जाणार नाही, असे संरक्षण प्रवक्ते कर्नल सोंबित घोष यांनी सांगितले.
जोधपूर येथील हवाई तळावरील “मिग-27’विमानांची तुकडी निवृत्त होणारी ही देशातील अखेरची तुकडी असणार आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील या विमानांची ही अखेरची तुकडी आहे. अन्य कोणत्याही देशाच्या हवाई दलांमध्ये “मिग-27′ विमाने नाहीत. त्यामुळे “मिग-27′ विमाने खऱ्या अर्थाने इतिहासजमा होणार आहेत, असे कर्नल घोष म्हणाले.
सेवेतून थांबवल्यानंतर या विमानांचे पुढे काय केले जाणार आहे, हे अद्याप निश्चित नाही. मात्र बहुतेक ही विमाने युद्धस्मारक म्हणोन जतन केली जातील, हवाई तळावर परत पाठवली जातील किंवा अन्य एखाद्या देशाला दिली जातील. जोधपूरच्या हवाई तळावर “मिग-27’च्या दोन तुकड्या आहेत. त्यापैकी एक तुकडी या वर्षाच्या सुरुवातीलाच सेवेतून थांबली आहे. आता “स्कॉर्पियन 29’नावाच्या तुकडीमध्ये अद्ययावत 7 विमाने आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालमधील हशिमारा येथील हवाई तळावरून “मिग-27’च्या दोन तुकड्या सेवेतून निवृत्त करण्यात आल्या आहेत, असेही कर्नल घोष यांनी सांगितले.
भारतीय वायुसेनेच्या या गौरवशाली आणि प्राणघातक लढाऊ विमानाला औपचारिक समारंभात निरोप देण्यात येईल. “मिग 27′ चे सर्व वैमानिक विमानाच्या शेवटच्या उड्डाणासाठी हवाई कसरती करतील आणि तळावर उतरल्यावर “मिग-27’ला अखेरची मानवंदना देण्यात येणार आहे. असे सूत्रांनी सांगितले.